Friday, August 9, 2013

सगळ्यात अवघड गड!

आमच्या दहावीच्या अभ्यास शिबिरात खूप छान छान व्याख्यानं झाली. एका संध्याकाळी व्याख्यानाला वेळ होता म्हणून आम्ही ५-६ जणी शाळेशेजारी आमच्या नेहमीच्या ठिकाणी गप्पा मारत उभ्या होतो. एक मध्यम वयाचे गृहस्थ तिथे सायकलवरून आले आणि त्यांनी काहीतरी विचारलं, बहुदा सायकल कुठे लावू की असंच काहीतरी. आम्ही त्यांना उत्तर दिलं आणि पुन्हा गप्पांत दंग झालो. आता आम्हाला काय माहिती की आपले आजचे प्रमुख पाहुणे सायकलवरून येणार आहेत म्हणून!
ते प्रमुख पाहुणे होते प्रा.प्र. के. घाणेकर! त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात केलेल्या भटकंतीवर गप्पामारल्या. व्याख्यान खुपच रंगलं. प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांना कुणीतरी विचारलं, " सर, तुम्ही इतके गड किल्ले सर केले आहेत. तर त्यातला सगळ्यात अवघड किल्ला कुठला होता?" त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर अजून माझ्या मनात रुतून बसलं आहे. ते म्हणाले, "खरं सांगू का? सगळ्यांत अवघड गड असतो तो उंबरठा गड! म्हणजे तुमच्या घराचा उंबरठा! एकदा तुम्ही तो पार करून बाहेर पडलात ना की मग कोणताही गड अवघड रहात नाही!" त्यावेळी ते उत्तर ऐकून मज्जा वाटली होती. पण आता जाणवतं की हे किती खरं आहे ते!
आता वाटतं की तो घराचा उंबरठा देखील प्रतीकच असतो. ओलांडण्यासाठी सर्वात अवघड असतो तो मनाचा उंबरठा! आपले पूर्वानुभव, इतरांचे सल्ले आणि समाज रुढी यांनी बनलेला. हे उंबरठे आपल्या मनात आपणच आपल्या नकळत उभारत असतो. ते जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. आणि तो मनाचा उंबरठा एकदा ओलांडला ना की मग पल्याडची न्यारी दुनिया आपली वाटच बघत असते!

No comments:

Post a Comment